➡️ महाराष्ट्र धर्माच्या रक्षणासाठी आज परळीत काँग्रेसचा ‘सद्भावना संकल्प सत्याग्रह’
◾प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खा. रजनीताई पाटील यांच्यासह काँग्रेस नेत्यांचा सहभाग.
◾परळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
◾ सामाजिक ऐक्यासाठी या सत्याग्रहात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला बळ द्यावे – जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांचे आवाहन
परळी वैजनाथ ( प्रतिनिधी )
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने सामाजिक सौहार्द आणि महाराष्ट्र धर्माच्या बळकटीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या अभियानाचा भाग म्हणून बीड जिल्ह्यातील परळी शहरात आज ‘सद्भावना संकल्प सत्याग्रह’ होणार आहे.
या सत्याग्रहाचे नेतृत्व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ करणार असून, खासदार रजनीताई पाटील, तसेच इतर वरिष्ठ काँग्रेस नेते आणि पदाधिकारी यावेळी सहभागी होणार आहेत. परळी शहर आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या सत्याग्रहात सहभागी व्हावे असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल सोनवणे यांनी केले आहे.
पूर्वतयारीसाठी दिनांक 28 एप्रिल रोजी परळी येथे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल सोनवणे यांनी राज्यातील सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “परभणी, बीड, नागपूरसारख्या भागांमध्ये अलीकडेच घडलेल्या घटनांनी राज्यातील सामाजिक शांतता भंग करण्याचे काम केले आहे.
सोनवणे पुढे म्हणाले, “दुर्दैवाने, आज सत्तेवर असलेल्या घटकांकडून या विघातक शक्तींना अप्रत्यक्ष पाठिंबा मिळतो आहे. मात्र काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात पुन्हा एकदा सर्व जाती-धर्मातील बंधुभाव वाढवण्यासाठी सद्भावना यात्रांचे आयोजन केले आहे.
याआधी मस्साजोग ते बीड व नागपूर शहरात सद्भावना यात्रा काढण्यात आली, जनतेने या यात्रांना प्रचंड प्रतिसाद दिला असून नाशिकमध्येही अशीच सद्भावना यात्रा होत आहे. गेल्या काही दिवसांपासून बीड आणि परळी परिसरातील घटनांमुळे या परिसरात सद्भावनेची आवश्यकता असल्याने
परळीतील सद्भावना संकल्प सत्याग्रह मोंढा परिसरातील गांधी स्मारक स्तंभ येथे होणार आहे. या ठिकाणी समाजातील विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर, वकील, उद्योजक आणि युवकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन राहुल सोनवणे यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेस परळी शहर काँग्रेस अध्यक्ष बहादूर भाई, ॲड. प्रकाश मुंडे, प्रकाशराव देशमुख, शिवाजीराव देशमुख यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.