गाय गोठ्यांचे अनुदान प्रशासनाने शेतकऱ्यांना तात्काळ द्यावे- तुळशीराम पवार*
परळी (प्रतिनिधी):- परळी तालुक्यातील शेतकऱ्यांना जनावरांसाठी निवारा व्हावा या उदात्त हेतूने गाय गोठे मंजूर करण्यात आले. अनेक शेतकऱ्यांनी गाय गोठ्यांची कामेही पूर्ण केली. परंतु गाय गोठ्यासाठी आलेला निधी मात्र अनेक शेतकऱ्यांना मिळाला नाही. यामुळे शासनाची गाय गोठा ही योजना परळी तालुक्यात मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली असली तरी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांना मात्र गाय गोठा ऐवजी तोटा सहन करावा लागला असल्याचे चित्र दिसून येत आहे.
गाईपालन हा भारतीय कृषी अर्थव्यवस्थेचा व ग्रामीण जीवनाचा अविभाज्य भाग आहे. गायीचे दूध, शेण आणि गोमूत्र हे केवळ आर्थिक उत्पन्नच देत नाहीत तर शेतीसाठीही उपयुक्त ठरतात. परंतु वाढत्या शहरीकरणामुळे जमिनीचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. जनावरांच्या चाऱ्याची अडचण निर्माण होत आहे. यांमुळे गायीचे पालन करणे शेतकऱ्यांसाठी कठीण बनले आहे. यावर मात करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना गायीचे पालन करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सरकारद्वारे गाय गोठा अनुदान योजना राबवली जात आहे. परळी तालुक्यात ही योजना शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात राबविली. जनावरांच्या निवाऱ्यासाठी गाय गोठे ही बांधले. या योजनेसाठी सरकारकडून शेतकऱ्यांना १ लाख ६० हजार रुपये अनुदान देण्यात येते. परंतु काही जणांना तीन हजार रुपये, सतराशे रुपये, ९ हजार रुपये असे अनुदान आतापर्यंत मिळाले आहे. यामुळे दीड ते दोन लाख रुपये खर्चून गाय गोठे बांधलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी मात्र तोटाच पडला आहे. अनेक वेळा संबंधित विभागाकडे अनुदानासाठी चकरा मारूनही शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही. ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.
———–
*शेतकऱ्याची आर्थिक पिळवणूक थांबवावी*
परळी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना गायगोटे मंजूर झाले. शेतकऱ्यांनी गायगोटेही शासनाचे अनुदान मिळेल या आशेवर खिशातील पैसे घालून, कर्ज काढून बांधले. एक लाख साठ हजार रुपये शासनाचे अनुदान मंजूर असताना प्रशासनाने मात्र शेतकऱ्यांना भीक दिल्यासारखे शेतकऱ्यांना सतराशे रुपये, तीन हजार रुपये, 9 हजार रुपये असे अनुदान वाटप केले आहे. उर्वरित अनुदान प्रशासनाने शेतकऱ्यांना तात्काळ द्यावे व त्यांची आर्थिक पिळवणूक थांबवावी. अन्यथा या प्रश्न लवकरच लाभार्थी शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करणार आहोत.
– *तुळशीराम पवार*
संस्थापक अध्यक्ष:- जनसंग्राम संघटना महाराष्ट्र राज्य तथा प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार
———-
त्यांचे गायपालन व्यवस्थित व स्वच्छ ठेवण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. शेतकऱ्यांना गोठा बांधणीसाठी लागणाऱ्या खर्चाचा काही भाग शासनाकडून अनुदान म्हणून देण्यात येतो. चांगला गोठा बांधून गायींचे जनावरांचे पालन सोयीचे व्हावे याकरिता मी गाय गोठा बांधला परंतु मला फक्त पाच हजार शंभर रुपये अनुदान अद्याप पर्यंत मिळाले आहे.
*राजेभाऊ इंगळे*
शेतकरी,
रा.मिरवट, ता. परळी वै.