माझ्यावर दाखल केलेला विनयभंगाचा खोटा गुन्हा हा केवळ खंडणीच्या उद्देशानेच – डॉ.बालाजी फड
परळीत डॉक्टरांना बदनाम करण्याचे षडयंत्र
परळी :
माझ्यावर दाखल करण्यात आलेला विनयभंगाचा गुन्हा हा केवळ खंडणीच्या उद्देशानेच दाखल करण्यात आलेला आहे.तो पूर्णपणे खोटा आहे. याबाबत पोलिसांना आठ दिवसापूर्वी मी लेखी तक्रार दिल्यानंतरही माझ्यावर गुन्हा दाखल झाला असे मत परळी येथील बालरोग तज्ञ डॉ. बालाजी फड यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. तसेच परळीतील डॉक्टरांना बदनाम करण्याचे षडयंत्र केले जात असल्याचेही ते म्हणाले.
याबाबत पत्रकारांशी बोलताना डॉ. बालाजी फड पुढे म्हणाले की, माझ्यावर गुन्हा दाखल करणा-या महिले विरोधात मी दिनांक 27 नोव्हेंबर रोजी तक्रार दिली होती. यामध्ये मला पैशाची मागणी करण्यात येत असून विनाकारण त्रास देण्यात येत आहे असे नमूद केले होते.
संभाजीनगर पोलिसांनी त्यावेळी गुन्हा दाखल केला नाही. परंतु 2 डिसेंबर रोजी सदरील महिलेने माझ्या रुग्णालयात येऊन माझ्यासह पत्नी व माझ्या कर्मचाऱ्यास मारहाण केली व आमच्यावरच विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला. आणि पोलिसांनी कोणतीही शहानिशा न करता गुन्हा दाखलही केला.
महिलेने विनयभंग व मारहाणीचा जो गुन्हा दाखल केला तो गुन्हा माझ्या डॉक्टरी पेशाची बदनामी करून माझ्याकडून खंडणी वसूल करण्यासाठीच दाखल केला असून सदरील महिला प्रचंड फ्रॉड असून या महिलेकडे दोन बनावट आधारकार्ड असल्याचे ते म्हणाले.
मी मागील सुमारे १८ वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रात प्रामाणिकपणे सेवा देत आहे. प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या व्यक्तीला बदनाम करण्याचे काम केले जाते आहे. हे षडयंत्र परळीतील समाजाने हाणून पाडले पाहिजे व सत्य ओळखून या प्रवृत्तीना वेळीच पोलिस प्रशासनाने पायबंद केले पाहिजे असेही पत्रकार परिषदेत बोलताना डॉ.बालाजी फड़ यानी सांगितले.